ह्या जगात न थांबणारी एकच गोष्ट म्हणजे "वेळ". रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात हा "वेळ" कसा, कधी आणि कुठे निघुन जातो ह्याचं आपल्याला भानंच राहत नाही. वेळ निघुन गेल्यावर मात्र नेहमीच वाटतं राहतं की काहीतरी राहून गेलं. मग अशावेळी आपल्या आठवणीतले छोटे छोटे क्षण देखील ही उणीव भरून काढणारे ठरतात. खूप महत्त्वाचे आणि अमूल्य असे वाटतात.
खरंच, जीवनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाखमोलाचा ठेवा असतो आणि तो आपण सगळ्यांनीच जपायला हवा.
कधी कधी असं वाटतं त्याच कट्ट्यावर पुन्हा जमावं,
मित्र आणि कटिंग सोबत तासंतास पडून रहावं...
शाळेच्या गप्पा आणि कॉलेजचे किस्से व्हावेत,
प्रोफेसर्स्च्या नकला आणि गिटारवरचं एक गाणं व्हावं...
कधी कधी असं वाटतं तिच पिकनीक पुन्हा निघावी,
भरलेल्या पावसात घाटामधुन गाडी आपली स्वैर फिरावी...
समुद्रावरचे किस्से अन् डोंगर सारे सर करावेत,
एक तरी पेग चीअर्स करून रात्र सुध्दा गाजवून द्यावी...
कधी कधी असं वाटतं बॉसचं म्हणणं मुद्दाम टाळावं,
मिटिंग रिक्वेस्ट डिनाय करून मस्त कॅन्टिन मधे फिरत बसावं,
लेक्चर बंक केल्याची मग आठवण व्हावी
आणि प्रोक्झी लागल्याचं समाधान पण मिळावं...
कधी कधी असं वाटतं पुन्हा ताईची खोडी काढावी,
मग बाबांनी ओरडा द्यावा आणि आईनी माया करावी...
असं वाटतं मनातलं सारं काही बोलून जावं,
पण तिची नजर वळण्याआधीच आपली बोलती बंद व्हावी...
मग मधेच कधीतरी असं वाटतं हे सगळं परत घडेल का?
निसटलेल्या गोष्टी पुन्हा आपल्या हाती येतील का?
मग मनात कितीही वाटलं तरी वेळ असाच निघुन जातो
प्रश्न फक्त एकच राहतो की "ह्या आठवणी तरी राहतील का?"
-मंगेश केळकर
No comments:
Post a Comment