सध्या माणसाचं महत्त्व एक "माणूस" म्हणून कमी होत चाललं आहे. आज काल मैत्री करताना सुद्धा हा मित्र पुढे आपल्याला कसा उपयोगी येईल याचा विचार आधी होतो आणि मगच मैत्री होते.
नाती जपण्याआधी स्वार्थ जपला जातो आणि ह्याला "काळाची गरज" असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं.
जो पर्यंत माणसाच्या शब्दाला किंमत आहे तो पर्यंत त्यालाही किंमत असते, पण जेव्हा त्याचे शब्दच संपतात तेव्हा माणूस म्हणून देखील त्याला कवडी मोलाचीही किंमत मिळत नाही.
क्षणार्धात सगळ्या गोष्टी होत्याच्या नव्हत्या होऊन जातात.
नाव ती लाटेवरी काठावरून मी पाहिले
पाहिले जे ह्या तटावरी त्या तटावरी राहिले...
पाहता तो डोह मोठा श्वास माझा थांबला
भान सारे भंग झाले अश्रु सारे वाहिले...
पापण्या लवल्या जरा त्या अश्रुंना थांबावया
अश्रु सारे हासती डोळ्यांमधे ना थांबले...
शब्द आणि अर्थ त्यांचे वित्त त्यांना मोजुनी
भाबडी ती मूर्त त्याची देतसे धुडकावुनी...
पाहतो मी आज ज्यांना हे ते नव्हे जे पाहिलेले
मित्र आणि आप्त सारे दूर आज राहिलेले...
-मंगेश केळकर